Thursday, April 1, 2010

गझलेबद्दल बरेचदा उलट सुलट चर्चा सुरू असते. गझल म्हणजे वॄत्त नसून वॄत्ती आहे, गझल म्हणजे हॄदयाचा हुंकार आहे यासारखी पोरकट विधानेही सर्रास ऐकू येतात. फारसी, उर्दू आणि आता मराठी आणि गुजराती सारख्या सम्मॄध्द भाषांमधून प्राचुर्याने लिहील्या गेलेल्या, किमान सहा शतकांचा इतिहास असलेल्या एका साहित्य विधेची अशी मर्यादित आणि संकुचित व्याख्या करण्याचा प्रयत्न करणे वैचारिक अपरिपक्वतेचे लक्षण आहे. असाच काहीसा प्रकार यमक आणि व्याकरणाच्या बाबतही आहे. स्वर यमक चालणार नाही, गझलेत किमान पाच शेर असलेच पाहिजेत, शेवटच्या द्वैपदीत कवीचे नाव असलेच पाहिजे, शेरांमध्ये झटका असला पाहिजे ,गझलेत समाजाला शिवीगाळ केलीच पाहिजे ई गैरसमज " नियम " म्हणून रूढ करण्याचा प्रयत्न वर्षानुवर्षे केला गेला. हा प्रकार पाहून मराठीतले चांगले कवी गझलपासून दूर न राहते तर नवलच! शिवाय वैचारिकतेशी आमच्या गझल'कार' ( हा ही आमच्या मंडळींचा आवडता शब्द ) मित्रांचे हाडवैर असल्याने वर्षानुवर्षे उथळ, अपरिपक्व आणि भडक गझला पाडल्या गेल्या. साहित्येतर क्षेत्रातील मंडळींनी चालविलेल्या तथाकथित चळवळीमधून हे गैरसमज आणखीनच फोफावत गेले.

गझलेमध्ये आणि कवितेमध्ये फरक काय आहे असा एक मुद्दा नेहमी उपस्थित केला जातो. कवितेमध्ये एकच विचार खुलवत नेला जातो, तर गझलेमध्ये अनेकविध विचार असू शकतात्.असलेच पाहिजेत असे नाही. मागे एका लोकप्रिय उर्दू कवीच्या ' आई ' या एकाच विषयावर लिहिलेल्या गझलेवर, ती गझल नसून गझल सदृष कविता आहे असा आरोप झाला होता. वास्तविक हा एक अयोग्य आक्षेप आहे. गझलेच्या शेरांमधून अनेकदा विविध विचारांचे वर्णन होत असले, तरी प्रत्येक काळात एकाच विचाराला अनुसरून लिहिलेल्या, एकाच मनोभौमिक अवस्थेचे चित्रण करणार्‍या गझला बाहुल्याने लिहिल्या गेल्या आहेत. एक अगदी जुने उदाहरण पाहुयात. सिराज औरंगाबादी या सोळाव्या शतकातल्या कवीची एक अप्रतिम गझल आहे :

खबरे तहैय्युरे इश्क सुन ना जुनू रहा ना परी रही
ना तो मैं रहा न तो तु रहा जो रही सो बेखबरी रही

या संपुर्ण गझलेवर प्रेमाची गडद छाया दाटून राहिलेली आहे. पहिल्या कडव्या मध्ये प्रेमातील आश्चर्य, कुतूहल , तर नंतरच्या शेरांमध्ये प्रेमाच्या इतर गोष्टी कवीने सांगितलेल्या आहेत. मग ही गझल नसून एक प्रेमकविताच आहे असे म्हणता येणार नाही का ?

नाही. या प्रश्नाचे उत्तर गझलेच्या संहितेमध्ये, गझलेच्या बारिक सारिक धाग्यादोर्‍यांमध्ये दडलेले आहे. गझलियत किंवा "गझलपणा" ची व्याख्या शेर सांगण्याच्या ( वाचण्याच्या नव्हे ) संहतीमध्ये निहित असते. गझलेचा एक शेर एक स्वतंत्र 'एकक' अथवा "संकुल" म्हणुन सहज श्वास घेऊ शकतो. गझल ही अनेक व्यामिश्र आणि जटिल संवेदनाची शृंखला असते. ही संपॄ़क्तता कवितेच्या कडव्यांमध्ये असेलच असे नाही. कवितेचा पट भौतिकदॄष्ट्या गझलेपेक्षा काहिसा पॄथुल आणि दीर्घ असल्याने ओळींगणिक एखादी संवेदना खुलत जाते. बालकवींचा औदुंबर पुर्ण समजून घ्यायचा असेल तर ही संपुर्ण कविता वाचावीच लागते. गझलेचे असे नाही. ओवी आणि हायकू हे दोन कवितेचे प्रकार या दृष्टीतून गझलेच्या अत्यंत जवळ जाणारे आहेत.
अनेक विचारांचे घनीकरण शक्य होते. अनेकांचे होत नाही. त्यामुळेच एखाद्या संवेदनेची कविता होते, एखादीची गझल.
इथे कविता श्रेष्ठ की गझल हा मुद्दा उपस्थित होत नाही. खरेतर हा एक अत्यंत अविवेकी विचार आहे. ( Contd. )


---


अनेक  वर्षांनं तर ही पोस्ट एडीट करतो आहे. तगझ्झुल म्हणजे काय आणि इतर अनेक गोष्टींचा सविस्तर विचार  माझ्या '  गझल काही नोंदी ह्या लेखातून केला आहे. हा लेख समकालीन गझल ह्या अनियतकालिकात उपलब्ध आहे :

http://home.iitk.ac.in/~chavan/samakalin%20gazal_first%20issue%20-%20main_final_3.pdf

2 comments:

Gangadhar Mute said...

या विषयावर अधिक चर्चा व्हायला हवी.

Sameer said...

I think it's now the hightime for the so-called Gazalkaars to think over the serious issues discussed in the Anant's article, which is a masterful write-up. How far they can go with their childish poetry? Although,

rahe-majmune-tajaa band nahi
taa-kayamat khula hai baabe-sukhan

at some time, they need to go the basics!

सिनिकल माणसाचं इतिवृत्त

तुम्ही जगता - मौजमजा करता  मग यथावकाश मरता तुमच्या जागी दुसर कुणीतरी येत जग सुरू राहात काहीही बदलत नाही काहीही बदलणार नाही काही बदलण अपेक्षि...