Friday, November 9, 2012

संवाद-१




 तिला म्हणालो की मी वैतागलो आहे.एकंदरीत जगण्याची वीण आणि आपल्या गुणसूत्रांची विशिष्ट रचना - ह्याचा काही मेळ बसताना दिसत नाहीए ती म्हणाली की तू अनेकदा अनेक गोष्टींचा विचार करतोस आणि व्यथित होतोस. माणसाला आपल्या विचारांवर ताबा मिळवता आला पाहिजे.
मी म्हणालो की याचा अर्थ समोर जे दिसतंय त्याचा विचार करायचा नाही. आधी जे बघितलंय त्याचा विचार करायचा नाही. पुढे काय करायचंय.गतकाळात घडून गेलेल्या गोष्टी. यात सगळं काही आलं. बरे वाईट अनुभव. आपले लहानसहान जय पराजय. प्रेम. शरीराच्या शेवटच्या सीमा गाठेतो केलेला संभोग.स्त्री शरीराचे उपजत आकर्षण.या आकर्षणापोटी आपल्या आसपासच्या स्त्रियांविषयक केलेल्या कल्पना. शरीरसंभोगाइतकी गुंगवून- हरखून टाकणारी जबरदस्त शक्ती इतर कुठली असावी हा विचार. बहुतेक शारीरिक वेदना. शारीर वेदनेइतके धडधडीत खरे काहीच नाही. मला या क्षणी जी गुडघ्यातनं निघणारी जबरदस्त कळ हैराण करते आहे, तिच्या इतका इतर कुठलाही सिध्दान्त मला खरा वाटत नाहीए. काल ट्रिनीटी चौकात काही पुस्तकं पाहिली. तत्वचिंतनाची केम्ब्रिजी चमक आणि पुरातन इमारतींच्या जबरदस्त सावल्या या विरोधाभासात ती पुस्तकं कशी सुंदर दिसत होती. नैतिकता - अमुक अमुक. स्वभावाची पाळेमुळे - अमुक अमुक; ग्रीक शोकांतिकेचे आकलन- क्षयज्ञ. आहा. असे काहीतरी काम केले पाहिजे. आपले साले दिवस व्यर्थच निघून चालले आहेत. पण एवढयाने काही होत नाही. काहीच होत नाही. या शोकांतिकांमधून तरी काय निष्पन्न झाले आहे. अहंकार- स्वविषयक जाणीव, भूमिका आणि विशिष्ट कल्पना. मग या कल्पनेशी आणि त्या कल्पनेतल्या आपल्या आकृतीशी इतरांचे वर्तन ताडून बघणे. अमूक मला असे बोलला, त्यावर मी हे बोललो. कदाचित नीट उत्तर दिले नाही. या लोकाना वेळचेवेळी सरळ केले नाही तर साले डोक्यावर चढतील. आणि इतरांचा देखील अहंकार. लोक खोटे बोलतात. इतरांबद्दल वाईट विचार करतात .आपण किती बरोबर आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात.
देश, प्रांत, भाषा. खरेतर आपल्या ओळखीच्या गोष्टी. म्हणजे लहानपणापासून पाहिलेले विशिष्ट चेहरेपट्टीचे लोक. या लोकांच्या बोलण्या-खाण्यापिण्याच्या लकबी. आपल्या घराजवळचा आणि शालेय पुस्तकांतून भेटलेला परीसर. घरीदारी बोलली जाणारी भाषा. जगण्याची पध्दत- जिचे उदात्तीकरण स्वरूप - धर्म.
मी तिला म्हणालो, तू कोण आहेस. आणि आपण जे बोलतो आहोत या संवादाचे स्वरूप काय आहे.
यावर ती म्हणाली की मी कोण आहे - हा मोठा गूढ प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर समजू नये म्हणून गोष्टींची रचना झालेली आहे. गोष्टींचे बनणे, वाढणे आणि लयास जाणे हा या प्रश्नाच्या वेटोळ्याचा एक भाग आहे. या वेटोळ्यातून निघणार्या सुत्राच्या एका टोकास मी, एका टोकास तू आहेस असं समज. माझी अवस्था तुझ्याहून वेगळी नाही.माझे दु:ख तुझ्याहून वेगळे नाही
अनंत ढवळे

Sunday, November 4, 2012

एलेजी


कधी काळ आपला नाही म्हणून
कधी
लोक आपले नाहीत म्हणून

कधी रस्ते ओळखीचे नाहीत म्हणून
कधी
आधार सापडले नाहीत म्हणून

कधी व्यवस्था आपली नाही म्हणून
कधी
आपली व्यवस्था उभारता आली नाही म्हणून

कधी भूमिका फसल्यात म्हणून
कधी
बाजू ठरवताच आल्या नाहीत म्हणून

कधी भोगवादाचा चीड आली म्हणून
कधी
वस्तूंच्या झगमगाटात हरऊन गेलोत म्हणून

कधी आदर्श सापडले नाहीत म्हणून
कधी
वाटा पाडता आल्या नाहीत म्हणून

कधी इतिहास समजला नाही म्हणून
कधी
वारसा खोटाय हे समजलं म्हणून

कधी नाकारलो गेलोत म्हणून
कधी तग धरू शकलो नाहीत म्हणून

कधी संतापण्याच्या सर्व शक्यता मावळल्याहेत म्हणून 
कधी
आरामात जगण्याची सवय झाली आहे म्हणून

मी विचार करतो की आपण सगळे
असे
रस्त्याकाठी हतबल उभे आहोत का म्हणून -

अनंत ढवळे
November 12
(Milton Keynes)

सिनिकल माणसाचं इतिवृत्त

तुम्ही जगता - मौजमजा करता  मग यथावकाश मरता तुमच्या जागी दुसर कुणीतरी येत जग सुरू राहात काहीही बदलत नाही काहीही बदलणार नाही काही बदलण अपेक्षि...