चिंतक म्हणेल फक्त बघत राहा
प्रतिक्रिया देणे व्यर्थ आहे, नपेक्षा
मराठी गझल आणि कविता
मराठी गझल आणि कविता - अनंत ढवळे / Marathi Gazals and Poems by Anant Dhavavle Copyright © Anant Dhavale; Please do not reprint/use in any other media format without proper permission. Author contact - anantdhavale@gmail.com. A blog committed to Marathi Gazal and Poems
Saturday, September 19, 2026
बघ
भाषा
आधी येते
जीवनयापन
नंतर येते भाषा
मग खूप नंतर कधीतरी
संघटित धर्म
२.
भाषा धर्माहून जुनी आहे
म्हणजे
आपले धर्माधारित भाषाभिनिवेश देखील
नवेच आहेत.
३.
भाषा म्हणजेच जाणीव
किंवा चेतना
किंवा चेतनेचा
दस्तऐवज
असे गृहित धरणे
ठीकच आहे
भाषेला धरून
तुम्ही पोचू शकता
थेट ज्ञात उगमापर्यंत.
४.
इतिहास लिहून घेतला जातो
मिथके बनत जातात
एरवी ही गुंतागुंत ना सोडवणारी
पण दोन्हींचे पुरावे सापडतात
भाषेच्या धूळ भरल्या
दप्तरांतून.
5.
प्रत्येक माणूस बनवत जातो
आपापली भाषा
आधीचे घेऊन
काही नवे जोडून
पण मुख्यत: बरेचसे त्यागून
एका अर्थी प्रत्येकातच दडलेला असतो
वेरूळचे लेणे खोदणारा
अनाम मूर्तिकार.
.अनंत ढवळे
Tuesday, August 25, 2026
1
स्वस्थ बसणे खरी कला मित्रा
एरवी मार्ग हा खुला मित्रा
रंग सारेच खूप बेढंगी
तू विसरशील कुंचला मित्रा
चित्त थाऱ्यावरी तुझे नाही
छंद वाईट लागला मित्रा
आपले मन उदास असले की
स्वच्छ आकाशाही बला मित्रा
साल हेही निघून गेलेले
काळ वाहून चालला मित्रा
रोजचा सूर्यही जुना होतो
सूर बनतात खोकला मित्रा
..
अनंत ढवळे
Sunday, August 9, 2026
2
हे जे निघून गेले
डोळ्यांपुढून सारे
काय त्याचे
हा जो प्रवास झाला
काय त्याचे
जगताना जे क्षरले
झिजले
आणि हरवले
आणि मग कधीतरी
मोजत असताना जे
आठवलेही नाही
काय त्याचे
ते जगणारे आपणच होतो
जे क्षरले
विस्मरणात गेले
तेही आपणच
हजारदा धूळ झटकून
पुन्हा उभे राहणारे देखील
आपणच
काय त्याचे ?
. अनंत ढवळे
लिरिक २
हे जे निघून गेले
डोळ्यांपुढून जीवन
काय त्याचे
हा जो प्रवास होता
काय त्याचे
जगताना जे क्षरले
झिजले
आणि हरवले
काय त्याचे
मग मोजत असताना जे
आठवले ही नाही
काय त्याचे
ते जगणारे आपणच होतो
जे क्षरलो ते देखील
काय त्याचे ?
— अनंत ढवळे
Tuesday, July 28, 2026
आलबेल
स्वत:ची अशी काही बरीवाईट मूल्यव्यवस्था असेल तर माणसे त्या मूल्यव्यवस्थेच्या ढासळण्याबद्दल चिंतित होतात - पण आपली सगळीच्या सगळी मूल्ये धोक्यात आहेत असे त्यांना जेंव्हा वाटू लागते तेंव्हा मात्र त्यांच्या मनात वैयक्तिक अथवा सामाजिक संकटाची पुरेपूर जाणीव निर्माण होते . मग लोक चिडतात आणि संघर्ष करू लागतात . यामागे केवळ मूल्यव्यवस्थेचे ढासळणे नसून भीती अथवा धोक्याची भावना देखील असते.
आपली मूल्ये कुठल्याही अडचणीत नसण्याची जाणीव माणसांना स्थैर्य अथवा सगळं काही आलबेल असण्याचा अनुभव देते.
पण अशी काही मूल्येच नसतील (किंवा ती असलीत तरी त्यांची जाणीव नसेल) आणि काही धोका वाटत नसेल तर घटनांकडे सपशेल दुर्लक्ष केले जाते.
आपली अशी काही मूल्ये आहेत अशी जाणीव नसेल पण भीती अथवा धोक्याची भावना असेल - तर लोक अस्वस्थ होतात. जे होतय ते बरं नाही अशी काही अस्फुट भीती वाटू लागते.
समाजातले बहुतेक घटक काळात यातल्या कुठल्या न कुठल्या अवस्थेतून जात असावेत असे वाटते. आपल्यासभोती घडणाऱ्या घटनांवर ज्या काही प्रतिक्रिया येतात त्या समजून घेण्यासाठी ही मांडणी तशी उपयोगी आहे.
( द सोशियोलॉजिकल इमॅजिनेशन या पुस्तकात ही रचना आलेली आहे. समजण्यात अथवा पुनर्मांडणी करण्यात काही घोळ झाले असतील तर ते माझे आहेत. )
Monday, June 15, 2026
लिरिक -1
-
'समकालीन गझल' मधला लेख - इथे पुन्हा देतो आहे. : --- गझल : काही नोंदी --- गझलेची व्याख्या काय असावी ह्याबद्दल अनेकदा चर्चा...
-
१. आहेत दोन नाही-नाही, अनेक उफाळून येणारे वर आपल्या आतून म्हणजे हे नाव-गाव ओळखपाळख निव्वळ चकवा. २. किती मी आलेत वर तवंगून ह्या निरंकुश म...
-
हे वरचे फोटो तसे जुने आहेत. व्हर्जिनियात राहात असताना जरा मोकळीक मिळाली की शॅनंडोआला जाणे हा माझा आवडीचा उपक्रम होता. हजारो एकर पसरलेलं जंगल...