Sunday, November 4, 2012

एलेजी


कधी काळ आपला नाही म्हणून
कधी
लोक आपले नाहीत म्हणून

कधी रस्ते ओळखीचे नाहीत म्हणून
कधी
आधार सापडले नाहीत म्हणून

कधी व्यवस्था आपली नाही म्हणून
कधी
आपली व्यवस्था उभारता आली नाही म्हणून

कधी भूमिका फसल्यात म्हणून
कधी
बाजू ठरवताच आल्या नाहीत म्हणून

कधी भोगवादाचा चीड आली म्हणून
कधी
वस्तूंच्या झगमगाटात हरऊन गेलोत म्हणून

कधी आदर्श सापडले नाहीत म्हणून
कधी
वाटा पाडता आल्या नाहीत म्हणून

कधी इतिहास समजला नाही म्हणून
कधी
वारसा खोटाय हे समजलं म्हणून

कधी नाकारलो गेलोत म्हणून
कधी तग धरू शकलो नाहीत म्हणून

कधी संतापण्याच्या सर्व शक्यता मावळल्याहेत म्हणून 
कधी
आरामात जगण्याची सवय झाली आहे म्हणून

मी विचार करतो की आपण सगळे
असे
रस्त्याकाठी हतबल उभे आहोत का म्हणून -

अनंत ढवळे
November 12
(Milton Keynes)

No comments: