जेंव्हा नासवली जाते एखादी भाषा
तेंव्हा नासवली जाते
एक उभी संस्कृती
+
भाषेसाठी पुढे येऊ नयेत मंत्री- संत्री
ह्यात आश्चर्य नाही — राजकारणी हा
लोकशाहीमधला सर्वतः
निरूपयोगी वर्ग आहे
पण भाषेच्या नावे भाकरी थापणारे
लेखक, कवी, अभिनेते, गायक
यांचं काय?
+
तुमच्या डोळ्यांदेखत खोडून काढली जाते आहे
चक्रधरमहदंबाज्ञानेश्वरनामदेवएकनाथतुकारामाची भाषा
तुमच्याच लोकांकडून.
+
नगरसेवकाला व्हायचंय आमदार
आमदाराला मंत्री
मंत्र्याला बनायचंय मुख्यमंत्री
प्रत्येकालाच चढायचंय वर
मग त्यासाठी तोडावी लागली राज्ये
किंवा
संपवावी लागली भाषा
तरी हरकत नाही.
+
पण हे काही एकमेव संकट नाही
भाषेपुढचं :
ह्या आधी काय केलंय आपण
— ह्यानंतरही काय करणार आहोत ?
+
विलियम कार्लोस विलियम्सने आयुष्यभर
खपून
आपल्या कवितेतून साधली होती
सामान्यांची भाषा
याउलट आपण काय करतो?
तर
उडवतो लोकभाषेची खिल्ली.
+
भाषा म्हणजे लोकायत
लोकांनी मिळून कळत- नकळत संकलित
केलेलं ज्ञान
भाषेचा हात धरून
आपण जाऊ शकतो हजार वर्षे मागे
अथवा पुढे.
+
प्रत्येकाला जपायचा आहे
आपापला निहित स्वार्थ
टिकवायचे आहेत हितसंबंध
पण भाषेचं काय?
कोण जपणार आहे भाषेचा पुरातन
आत्मबंध.
..
अनंत ढवळे
No comments:
Post a Comment